भारत उरलेले दोन सामने जिंकूनही टी-20 विश्वचषकाबाहेर जाऊ शकतो का?

फोटो स्रोत, Matt Roberts-ICC/ICC via Getty Images

फोटो कॅप्शन, सूर्यकुमार यादव
वाचन वेळ: 3 मिनिटे

वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (23 फेब्रुवारी) वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला.

सुपर-8 फेरीत झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अनेक विक्रम मोडीत काढले.

ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वाधिक धावसंख्या करून वेस्ट इंडिजच्या संघाने झिम्बाब्वेसमोर 255 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

टी-20 क्रिकेटच्या इतिहासातली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या होती. याआधी श्रीलंकेने 2007 साली 260 धावा केल्या होत्या.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

खरंतर आयपीएलमुळे भारतात आधीपासून लोकप्रिय असलेल्या विंडीजच्या खेळाडूंना पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी केली होती. पण आता वेस्ट इंडिजच्या विजयाने भारताचा या स्पर्धेतील पुढचा मार्ग अवघड बनला आहे.

वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेविरुद्ध 107 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे वेस्ट इंडिजची धावगती वाढली असून आता भारतासमोर उपांत्य फेरी गाठण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे.

सुपर-8 फेरीत ग्रुप 1मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज आहेत. या चारही संघांनी एक एक सामना खेळला असून यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विजयी झाले आहेत तर भारत आणि झिम्बाब्वेला पराभव स्वीकारावा लागला आहे.

या ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज अव्वलस्थानी आहे तर त्यांची धावगती 5.35 आहे. दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे त्यांचा नेट रन रेट 3.80 आहे.

भारताचा रन रेट -3.80 आहे तर झिम्बाब्वेचा मोठा पराभव झाला असल्याने त्यांचा रन रेट -5.35 आहे. झिम्बाब्वे या ग्रुपमध्ये शेवटच्या स्थानी आहे.

उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतासमोर मोठं आव्हान

पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभव झाल्याने भारताचा मार्ग आता कठीण होऊन बसला आहे.

या पराभवामुळे भारताचा नेट रन रेट देखील खूप कमी झाला आहे.

आता भारताला त्यांच्या पुढील दोन्ही सामने (वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे) जिंकावे लागणार आहेत. आणि मग एवढं करूनही इतर काही समीकरणांवर भारतीय क्रिकेट संघाचं भविष्य अवलंबून असणार आहे.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाले, "अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवले तरच भारत आता उपांत्य फेरीत पोहोचू शकेल. पण जर दक्षिण आफ्रिका हरली तर आपल्याला झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेला हरवावे अशी प्रार्थना करावी लागेल. कारण जर अशी परिस्थिती उद्भवली की भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी दोन सामने जिंकतील, तर भारतासाठी कोणतीही संधी नाही कारण नेट रन रेटच्या आधारावर भारत खूप मागे आहे."

फोटो स्रोत, Nikhil Patil/Getty Images

फोटो कॅप्शन, शिमरॉन हेटमायरने 34 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकारांसह 85 धावा केल्या.

झिम्बाब्वेने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली असली तरी दक्षिण आफ्रिकेला हरवणं त्यांच्यासाठी खूप अवघड असेल असं तज्ज्ञांना वाटतं. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा सध्याचा फॉर्म पाहता दक्षिण आफ्रिकेला सुद्धा वेस्ट इंडिजला हरवणं अवघड जाईल हे नक्की.

या विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या संघाने चमकदार कामगिरी केलेली आहे. वेस्ट इंडिजने स्कॉटलंडला 35 धावांनी, इंग्लंडला 30 धावांनी, नेपाळला 9 विकेट राखून, इटलीला 42 धावांनी आणि झिम्बाब्वेला 107 धावांनी पराभूत केलं आहे.

क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनी एक्सवर लिहिलं आहे, "वेस्ट इंडिज सगळ्याच संघांना कडवं आव्हान देत आहे."

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, सूर्यकुमार यादव

क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी एक्सवर लिहिले, "भारताने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने जिंकले पाहिजेत. शिवाय, जर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवले तर भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. तथापि, जर तिन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले तर भारत नेट रन रेटमध्ये इतका मागे राहील की तो स्पर्धेतून बाहेर पडेल."

म्हणून, जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर भारतासाठी या स्पर्धेतील प्रवास संपण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढेल.

याचा अर्थ असा की सुपर-8 चे उर्वरित दोन्ही सामने जिंकूनही, भारताला इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.